हवामान विभागाकडून देशातील 20 राज्यांना रेड अलर्ट; मोठं संकट निर्माण होण्याची चिन्हं

हवामान विभागाने देशातील 20 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या काळात काही राज्यांत मुसळधार पाऊस आणि वादळे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशामध्ये आता हवामानाची स्थिती सातत्याने बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, दरम्यान आता  हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील दोन दिवस पूर्व, उत्तर-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतामधील 20 राज्यांना भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, वादळे देखील या काळात होतील असा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटर असेल. हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेमका हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…

20 राज्यांना इशारा

01 जूनपासून आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, याच काळात अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या काळात हवेचा वेग हा 40 ते 70 किमी प्रति तास इतका राहण्याची शक्यता आहे.

दक्षिणेतील राज्यांत पावसाचा अंदाज

दुसरीकडे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील चार दिवस या राज्यांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सर्वदूर पाऊस बरसणार?

पुढील 24 तासांमध्ये या राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये आजपासून ते चार जूनपर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब आणि हरियाणामध्ये तीन जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील चार दिवस काय स्थिती?

दरम्यान, गेल्या आ़वड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र आता पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, पुढील तीन चार दिवस राज्यातील विविध भागात म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये १ ते ४ जूनदरम्यान मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर पुणे जिल्ह्यातही या काळात पाऊस बरसणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News