Tatkare-Gogavale : रायगडमधील तटकरे-गोगावले यांचे वैर आणि वाद सर्वश्रुत आहे. या दोन कुटुंबात विस्तव देखील जात नाही. महायुती सरकार येऊन आता सहा महिने होत गेले असले तरी अजूनही रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नॅपकिन उडवण्याची स्टाईल करत खिल्ली उडवली होती.
मात्र तटकरेंना आता ही खिल्ली महागात पडण्याची शक्यता दिसत आहे. आगामी काळात तटकरे-गोगावले पुन्हा वाद वाढण्याची शक्यता दिसत असून, पालकमंत्री पदाचा तिढा आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कार्यकर्त्यांकडून नॅपकिन उडवले…
दरम्यान, १ जून रोजी मंत्री भरत गोगावले यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमात भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी नॅपकिन उडवत खासदार सुनील तटकरे यांना प्रतिउत्तर दिलं आहे. आणि तटकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता गोगावले आणि त्यांच्या समर्थकांच्या कृतीवर सुनील तटकरे किंवा आदिती तटकरे कडून काय उत्तर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीत रायगडमधील वादावर तिन्ही पक्षातील नेते कोणता तोडगा काढतात, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
पालकमंत्री पद लांबणीवर…
महायुती सरकार आल्यानंतर सुरुवातीला अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री देण्यात आले होते. परंतु भरत गोगावले हे सुद्धा पालकमंत्री पदावर आडून बसले आहेत. आम्ही या जिल्ह्यासाठी लोकसभेत काम केले. मात्र त्यांना विधानसभेत काम केले नाही. असा आरोप गोगावलेंकडून केला जात आहे. तसेच यानंतर नॅपकिन युद्धावरुन वाद विकोपाला जाण्याची शक्यता असून, आगामी काळात दोघांमधील कलगीतुरा आणि पालकमंत्री पदावरुन वाद हा थांबण्याऐवजी वाढताना दिसत आहे. त्यामुळं महायुतीत रायगडमधील वाद डोकेदुखी ठरताना दिसत आहे.