03 जूनला आरसीबी विरूद्ध पंजाब फायनल; आयपीएल चषक कोणता संघ जिंकणार?

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आयपीएलच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. आयपीएल चषक कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.

अहमदाबाद: आयपीएल सीझन 2025 मधील शेवटचा आणि अंतिम सामना उद्या म्हणजेच 03 जूनला खेळला जात आहे. फायनल मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ठिक 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. खरंतर अवघ्या क्रिकेट विश्वाच्या नजरा या सामन्याकडे असणार आहे. दोन्ही संघ आयपीएलचे चषक जिंकण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या या अंतिम सामन्याचं महत्व मोठं आहे. जाणकारांच्या मते या सामन्यात बंगळुरूच्या संघाचं पारडं काहीसं जड मानलं जात आहे.

मुंबईला हरवत पंजाब फायनलमध्ये

पंजाब किंग्सने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवत आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा हे दोघे पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कॅप्टन श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा या जोडीने केलेल्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात इतिहास घडवला आहे. पंजाब किंग्सने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली आहे.

मुंबईने पंजाबला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 207 धावा केल्या. पंजाबने यासह आयपीएल इतिहासात 2014 नंतर पहिल्यांदा तर एकूण दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबईचं या पराभवासह या हंगामातील आव्हान संपुष्ठात आलं आहे.

फायनलमध्ये बंगळुरू आणि पंजाब भिडणार!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडकले आहेत, अशा परिस्थितीत दोन्ही संघांसाठी सामन्याचं महत्व मोठं आहे. जाबसमोर आता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुचं आव्हान असणार आहे. हा सामना 3 जून रोजी होणार आहे. दोन्ही संघांची फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच या स्पर्धेच्या इतिहासात नवी चॅम्पियन टीम मिळणार, हे देखील स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता 3 जून रोजी कोणता संघ ट्रॉफी उंचावतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

क्रिकेट जाणकारांच्या मते आरसीबीच्या संघाचं पारडं या सामन्यात काहीस जड असणार आहे. क्वालिफायर 1 सामन्यात आरसीबीने पंजाबला पराभूत केलं होते. तो आत्मविश्वास आरसीबीकडे असणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News