मुंबई- उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या भल्यासाठी आणि राजकारणातील बदलासाठी एकत्र यावं, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरुये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही एकत्र येण्याबाबत असलेले वाद हे महाराष्ट्र हितापेक्षा लहान असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरुये.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून याबाबत सातत्यानं विधानं करण्यात येत असली तरी मनसेकडून मात्र त्याला सावध प्रतिक्रिया देण्यात येताना दिसतंय. आता आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यानंतर या चर्चांना पुन्हा वेग आलाय.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
राज-उद्धव बंधुंनी एकत्र यावं का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलाय. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कुणी आमच्यासोबत येत असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊ. कल्याण डोंबिवलीत दोन दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेना आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं. हे त्याचंच उदाहरण आहे. जनतेच्या मनात जे आहे ते आम्हाला माहीत आहे. आमचं मन साफ आहे. असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
युती मीडियात होत नाही, चर्चा करावी लागते-मनसे
आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर युतीच्या चर्चांना पुन्हा जोर आला. मात्र मनसेचे पदाधिकारी प्रकाश महाजन यांनी युती मीडियात होत नाही, तर त्यासाठीचर्चाकरावे लागते. हे आदित्य ठाकरेंनी समजून घ्यायला हवे, असं म्हटलय. तर अद्याप अधिकृतपणे युतीच्या चर्चेसाठी कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही, असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सांगितलंय.
कोण देणार टाळी, मनसेची गूपचिळी
उद्धव ठाकरे हे युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र टाळीसाठी हात कोण पुढे करणार, यावरुन दोन्हीकडून वेट अँड वॉच सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी मनसेकडून टाळीसाठी अनेकदा हात पुढे करण्यात आला, चर्चा झाली, मात्र त्यातून पुढं काही घडलं नाही, असं सांगण्यात येतंय. त्यामुळे ठाकरेंच्याआवाहानला प्रतिसाद देताना, मनसे ताक फुंकून पित असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरेंचं नाव घ्यायला लाज वाटते का?- शिरसाट
तर शिंदेंची शिवसेना आणि भाजपाला युती नको आहे, त्यामुळे त्यांच्याकडून युती न होऊ नये यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत वक्तव्य करताना राज ठाकरेंचं नाव घेतलं नाही, यावर शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केलीय. राज ठाकरेंचं नाव घ्यायला लाज वाटते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र हितासाठी उद्या ओवैसी किंना अबू आझमी यांच्याशी युती कराल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.