ठाकरेंच्या सेनेचे २ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जीर्ण, आशिष शेलारांचे टीकास्त्र

उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आहे. आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, आम्ही कुणालाही संपविण्यासाठी नाहीतर मुंबईकरांची सेवा करण्यासाठी भाजपा पक्ष आहे, असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.

Mumbai :आगामी पालिका निवडणुकीच्या धरतीवर माजी नगरसेवकांना फोडण्यासाठी सध्या स्पर्धा लागल्याचे चित्र दिसतंय. दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सेनेचे दोन माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेला धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकरही उपस्थितीत होते.

आज नाटकाचा पहिला अंक, शेवटचा अंकही लवकरच…

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. असा सूचक इशारा शेलारांनी उबाठा गटाला दिला आहे.

त्यांना सोडून सगळे जाताहेत…

2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. उबाठाने मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News