Mumbai – निवडणुकीच्या आधी या सरकारने शेतकरी कर्जमाफी करु अशी घोषणा केली होती. मग त्या कर्जमाफीचे काय झाले? महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी १०० टक्के शेतकरी कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता सरकार येऊन सहा महिने झाले तरी अजूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी झाली नाही, कर्जमाफी कधी देणार? घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर? की, घरातला दिवा विझल्यावर… प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे सरकार असल्याची टिका संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहतंय का…
दरम्यान, पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, असंही जाहीरनाम्यात होतं. मग हे २१०० रुपये कधी देणार?, २१०० रुपये हे निवडणुकीच्या आधी देतील. हे सरकार आल्यानंतर २ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आता कर्जमाफीची योग्य वेळ आहे. पण सरकार काही करत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? शेतकऱ्यांच्या १२ हजार की १ लाख आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी करणार? हे सराकर शेतकरी कर्जमाफी हे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी करतील, हे यांचे धोरण आहे.

त्यांनी प्रशिक्षण घ्यावे…
राजकारणात कुठेही उथळपणा करुन चालत नाही. जेव्हा मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, तेव्हा खूप संयम आणि त्याग हवा असतो. राजकारणात उथळपणा चालत नाही. राजकारणात त्यांना प्रशिक्षण घेण्याची गरज आहे, अशी टिका संजय राऊतांनी संदीप देशपांडेंवर केली. आम्ही महाविकास आघाडीत भिन्न विचारांची माणसं एकत्र येऊन तीन वर्ष सरकार व्यवस्थित चालवले. पण राजकारणात माणसानं नेहमी संयमी आणि आशावादी पाहिजे. काही लोकांना त्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे, असा टोला राऊतांनी संदीप देशपांडे यांचे नाव न घेता लगावला.
अजित पवार राष्ट्रीय नेते गावात अडकलेत…
राज्याचा अर्थमंत्री व राष्ट्रीय नेते अजित पवार आपल्या गावात एका साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून ठांण मांडून बसलेले आहेत. राज्यातील प्रश्नांबाबत त्यांच्याकडे पैसे नाहीत. मात्र एका गावातील एका साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ते सगळे प्रश्न वाऱ्यावर सोडून तिथे ठांण मांडून बसलेत. मला कारखान्याचा चेअरमन करा, मी २४ तासात सरकारकडून ५०० कोटी आणून देतो, असं अजित पवारांनी म्हटलेय. मग अजित पवार हे ५०० कोटी कुणाचे लुटणार? अजित पवारसारखे राष्ट्रीय नेते गावात फिरताहेत, अजित पवारांसारखे नेते या राज्याला लाभले हे या राज्याचे दुर्दैव आहे, असं राऊत म्हणाले.