Monsoon Session : आज महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवारी 30 जून) सुरु होत आहे. हे अधिवेशन आजपासून 18 जुलैपर्यंत चालणार आहे. रविवारी काल पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. मात्र सरकारच्या पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पण विविध मुद्दयावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून, विरोधक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.
सभागृहात हे मुद्दे गाजणार…
दरम्यान, मुख्य प्रश्न म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, अकरावी प्रवेश प्रक्रिया घोळ, तिसरी भाषा, हिंदी सक्ती, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिला अत्याचार, अवकाळीमुळं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मुंबईतील रेल्वे अपघात, पावसामुळे मुंबईची झालेली तुंबई, रस्ते, खड्डे, जुने पूल, गुन्हेगारी अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊन, सरकारला घेरण्याच्या शक्यता आहे.

चहापानवर विरोधकांचा बहिष्कार…
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सांयकाळी सत्ताधारी पक्षाकडून परंपरेनुसार चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या चहापान कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आमंत्रण दिलं होत. मात्र यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. या भ्रष्ट सरकारच्या चहापानला जाणे म्हणजे पाप करण्यासारखं आहे, असं विरोधकांनी म्हटलं आहे. तसेच सभागृहात कोणकोणते मुद्दे मांडायचे, राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन सरकारला कसे घेरायचे, सरकारने दिलेल्या आश्वासनचा जाब विचारण्यासाठी विरोधकांनी जय्यत तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.