‘दोन भाऊ एकत्र आले, तर फडणवीसांना काय त्रास?’ संजय राऊतांचा सवाल

दोन भाऊ एकत्र येण्यात तुमच्या पोटात कशाल दुखत आहे, असा सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.

मराठी माणसाच्या एकजुटीपुढे राज्य सरकारला झुकावं लागलं. हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मागे घ्यावा लागला. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशणा साधला आहे. शिवाय ठाकरे बंधुंच्या युतीच्या मुद्द्यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केले आहे. नेमकं संजय राऊतांनी काय म्हटलं, ते सविस्तर जाणून घेऊ….

काय म्हणाले संजय राऊत?

‘देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय म्हणजे हिंदी सक्ती रद्द करणे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांन ओळखल्या. बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला शेवटी जनता रस्त्यावर उतरली. सर्व पक्षांनी मिळून अध्यादेशाची होळी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसकाच घेतला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकं येणार होते. आता कमिटी स्थापन कशाला केली? आम्ही त्रिसूत्री भाषा धोरण स्वीकारणार नाही, ‘ दोन्ही ठाकरे बंधूंनी आम्ही हे मान्य करणार नसल्याचं स्पष्ट केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

‘दोन भाऊ एकत्र आले तर त्रास का?’

दोन भाऊ एकत्र येण्यात तुमच्या पोटात कशाल दुखत आहे. तुम्ही सरकार बनवण्यासाटी जे काही भ्रष्ट कडबोळ एकत्र केलंय त्यावर व्यक्त व्हा. दोन एका विचाराचे नेते एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होताय, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसतंय, आता आपलं काय? असं संजय राऊत म्हणाले.

जुलैच्या मोर्चाची तयारी सुरू झाली होती. दोन्ही पक्षांनी दोन नेत्यांची निवड केली होती. तयारी झाली आहे तर आता याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशी दोन्ही बाजूची भूमिका आहे. यावर राज ठाकरे यांच्याशी बोलणं झालं, आम्ही चर्चा केली. आजे ते यावर आपलं मत देतील. मेळावा नक्कीच एकत्र होईल. विजय जल्लोषात कोणालाही दूर ठेवून जल्लोष होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित विजयी सभा होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News