मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

‘संधी सोडायची नाही, आरक्षण मिळवायचे’
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे आहे. मुंबईतील सर्वच लोकांनी मागे आपली सेवा केली, त्यात परप्रांतीय लोकांनी सुद्धा आपली सेवा केली आहे. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जरांगेंनी मराठा बांधवांसह पुन्हा एकदा आरक्षण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
‘विजयाचा गुलालही आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे.” मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. “ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे,” असे आवाहनही जरांगेंनी मराठा बांधवांना केलं.