बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची काय अपडेट? आंदोलन थांबणार की सुरूच राहणार?

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाने अवघ्या राज्याचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7 वा दिवस आहे. काल दिवसभर अमरावतीत आंदोलन स्थळी मोठ्या घडामोडी घडल्या. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भेटीला गेले. तर आज मंत्री उदय सामंत हे त्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण होणार की नाही तसेच कडूंचे आंदोलन सुरूच राहणार की हे आंदोलन मागे घेतले जाणार? असे अनेक सवाल आता या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

कडूंच्या आंदोलनाचा 7 वा दिवस

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.अन्नत्याग आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यांचे कार्यकर्ते पण अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत. काल एका कार्यकर्त्याने विषारी औषध प्राशन केले होते. तर काहींनी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोंडण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही अनुचित प्रकार आंदोलन स्थळी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.  बच्चू कडू आज काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

उदय सामंत भेटणार, तोडगा निघणार?

मंत्री उदय सामंत बच्चू कडू यांची आज भेट घेणार आहेत. या भेटीनंतर तरी या कडूंच्या आंदोलनातून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी मंत्री संजय राठोड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मंगेश चिवटे यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर अनेक संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाला राज्यात व्यापक पाठिंबा मिळत आहे. सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांविषयी आता ठोस आश्वासन देते की समित्यांचे पालुपद पुढे करत हा मुद्दा काही काळ पुढे ढकलते हे आज समोर येईल. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष आता या आंदोलनाकडे लागलं आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News