राज्यातील लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असून, यंदाचा आषाढी वारीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली असून, लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक भव्य आणि पवित्र यात्रा आहे. ही वारी दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला पंढरपूर येथे आयोजित केली जाते. लाखो वारकरी टाळ, मृदुंग व अभंग गात पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात. वारी ही भक्ती, सेवा आणि सामूहिकतेचे प्रतीक आहे.
जुलैमध्ये आषाढी वारी
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या या यात्रेचा मुख्य भाग असतात. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक पंढरपूरकडे पायी प्रवास करतात. वारीत शिस्त, समता आणि भक्तीभाव दिसून येतो. २०२५ मध्ये आषाढी एकादशी ८ जुलैला येणार आहे. यंदाही लाखो वारकरींचा महासागर विठ्ठलमय वातावरणात पंढरपूरात एकत्र येईल. ही परंपरा आपल्याला भक्ती, एकता आणि समर्पण शिकवते.

पोलीस यंत्रणा सज्ज
वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.
यंदा राज्यात समाधानकारक पावसामुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. अंदाजानुसार 15 ते 16 लाख वारकरी पंढरपूर येथे उपस्थित राहतील. भाविकांची ये-जा सुरळीत पार पडावी यासाठी एस.टी. महामंडळाने गावागावांतून अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. वारकऱ्यांची सोयीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.