State Government – गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने राज्यातील ४ महिन्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळं राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना निश्चित करा, असे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीना दिले आहेत.
किती जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका?
दरम्यान, राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि सदस्य संख्या याचे प्रारुप तयार करण्यासाठी ग्राम विकास विभागाने अधिसूचना जारी केली असून, राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रभाग रचना करण्यासाठी आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहिले होते.

कधीपर्यंत प्रभाग रचना करा?
– दिनांक १४/०७/२०२५ पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे
– दिनांक २१/०७/२०२५ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे
– दिनांक २८/०७/२०२५ पर्यंत प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे
– दिनांक ११/०८/२०२५ पर्यंत विभागीय आयुक्तांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय देणे
– दिनांक १८/०८/२०२५ पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे