रविवारचं पर्यटन बेतलं जीवावर, मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल गर्दीमुळे कोसळला; दोघांचा मृत्यू, 40 बेपत्ता

गेल्या दोन तीन दिवसांपासून मावळमध्ये प्रचंड पाऊस कोसळतो आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. रविवार असल्यानं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या पुलावर मोठी गर्दी झाली होती.

पुणे – रविवारचा सुट्टीचा दिवस साधून मान्सूनचा आनंद घेण्यासाठी मावळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मावळमध्ये कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं 40 जण वाहून गेले आहेत. या दुर्घटनेत सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहा जणांना वाचवण्यात यश आलंय.

नेमका काय घडला प्रकार?

मावळ भागात तळेगावजवळ इंदोरीमध्ये इंद्रायणी नदीवर हा पूल आहे. नदीला भरपूर पाणी असल्यानं आणि रविवार असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी या पुलावर झाली होती. हा पूल जुन्या काळातील असून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. नदीवर असलेल्या या पुलावर क्षमतेपेक्षा जास्त भार पडल्यामुळे दुापरच्या सुमारास हा पूल कोसळला. यावेळी पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पुलावर असलेले ४० हून जास्त पर्यटक पूल कोसळल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

मुसळधार पाऊस, पर्यटकांची हौस

गेल्या दोन तीन दिवसांपासून मावळमध्ये प्रचंड पाऊस कोसळतो आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. रविवार असल्यानं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या पुलावर मोठी गर्दी झाली होती. मोटारसायकल घेऊन अनेक पर्यटक या पुलावर जमा झाले होते. पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक पुलावर असल्यानं आणि पाण्याला असलेल्या प्रवाहामुळे पूल अचानक कोसळल्याची माहिती आहे. इंद्रायणी नदीला पूरस्थिती असल्यानं पाण्यात बुडालेले पर्यटक वाहून गेल्याचं सांगण्यात येतंय.

बचावकार्य सुरू

कुंडमळा येथील धबधबा प्रसिद्ध आहे. पुण्याहून मुंबईकडे येताना एक्सप्रेसवेवर प्रवेश करण्यापूर्वीच कुंडमळा हे ठिकाण लागतं. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या टीमही घटनास्थळी दाखल झाल्या असून नदीपात्रात बुडालेल्या पर्यटकांचा शोध आता घेण्यात येतोय. पोलीस, स्थानिक आणि अनेक संस्थांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य जोमानं सुरु आहे.

दोन जणांचा मृत्यू- मुख्यमंत्री

या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरपोस्ट लिहित त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. प्राथमिक माहितीत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असल्याचं सांगत, त्यांना मुख्यमंत्र्‍यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. या दुर्घटनेबाबत प्रशासकीय पातळीवर मदतकार्य सुरु असून, यावर लक्ष ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्‍यांनी लिहिलंय. या दुर्घटनेत सहा जणांना वाचवण्यात आलं असून, 32 जणं जखमी असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

या ठिकाणी आठ कोटींचा पूल मंजूर झाला होता-अजित पवार

इंद्रायणी नदीवर दुर्घटनाग्रस्त झालेला पूल हा लोखंडाचा होता आणि जीर्ण अवस्थेत होता. या ठिकाणी नवा आठ कोटींचा पूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक पुलावर आल्यामुळे अपघात झाला असल्याचं सांगण्यात येतंय.

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News