राज्यात लवकरच नव्या मार्गावर रेल्वे सेवा; कोणत्या मार्गावर धावणार रेल्वे?

राज्यात लवकरच एका नव्या लोहमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे एक महत्वाचं शहर आणि एक तीर्थक्षेत्र जोडलं जाणार आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ...

देशातील रेल्वेचं जाळ दिवसेंदिवस वृध्दींगत होत असताना आता राज्यातून महत्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच आणखी एका मार्गावर रेल्वेसेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील आणखी एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. शनि शिंगणापूरला थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्यामुळे, राहुरी ते शनीशिंगणापूर हा नवा रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. या 22 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी सुमारे 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

तीर्थक्षेत्रांना जोडणारा लोहमार्ग

शनि शिंगणापूर हे एक प्रमुख धार्मिक केंद्र असून, दररोज जवळपास 45 हजार भाविक शनिदर्शनासाठी येथे येतात. या रेल्वेमार्गामुळे राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर तसेच पैस खांब यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी, या भागातील स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या मार्गावर दररोज चार रेल्वेगाड्या धावणार असून, दरवर्षी सुमारे 18 लाख प्रवासी या मार्गाचा वापर करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रेल्वेसेवेच महत्व

राहुरी ते शनि शिंगणापुर रेल्वे मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा मार्ग विकसित झाल्यास यात्रेकरूंना शनि शिंगणापुर मंदिरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे आणि वेगवान होईल. धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत वाढ होईल. या मार्गामुळे गावांतील संपर्क सुधारेल, व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच, ग्रामीण भागातील लोकांना शहरांशी सहज जोडता येईल. हा प्रकल्प पर्यावरणपूरक आणि वाहतुकीच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरेल. शेतीमालाची वाहतूक सोपी होईल आणि स्थानिक जीवनमान उंचावेल. एकूणच, राहुरी ते शनि शिंगणापुर रेल्वे मार्ग सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल.

हा रेल्वेमार्ग विकास आणि अध्यात्मिक केंद्रांना जोडणारा दिशादर्शक प्रकल्प असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या योजनेला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News