BMC – 26 मे रोजी पावसाने मुंबईची तुंबई केली. यामुळं आता मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून या समस्येवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वर्षी पहिल्यांदाच वाहनांवर आरूढ १० फिरते उदंचन संच (Vehicle Mounted Mobile Pumps) तयार ठेवले आहेत. या वाहनात २ पंप बसवण्यात आले असून, प्रत्येक पंपाची क्षमता २५० घनमीटर प्रति तास इतकी आहे. सखल भागामध्ये साचणा-या पाण्याचा निचरा लवकर व्हावा, यासाठी महानगरपालिकेतर्फे उदंचन संच बसविण्यात आलेत.
पाणी साचू नये याची दक्षता…
दरम्यान, यंदा तर मे महिन्यातच पावासाचे आगमन होत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईची भौगोलिक रचना विचारात घेऊन महानगरपालिका दरवर्षी पूर व्यवस्थापन उपाययोजना करते. त्यात कमीत कमी वेळेत पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा आणि मुंबईकर नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाते. गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे पर्जन्यमानावर परिणाम झाला आहे. हे आता ठळकपणे दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षात मुंबईतील काही ठराविक भागात कमी कालावधीत २५० ते ३०० मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद आहे.

पूरपरिस्थितीवर उपाय…
तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी (Response Time) कमी असला पाहिजे. जेणेकरून फिरते उदंचन संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत. या वाहनांवर तीन सत्रांमध्ये म्हणजे २४ तास मनुष्यबळ उपलब्ध हवे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच या उपाययोजनेंतर्गत वाहन आरूढ फिरत्या उदंचन संचांची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित होऊन उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर वेळीच उपाय करणे शक्य होणार आहे. असं पालिका प्रशासनाने म्हटले आहे.