जून महिन्यातच पवई तलाव १०० टक्के ओव्हर फ्लो, पालिका प्रशासनाची माहिती

महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक १८ जून २०२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

Powai Lake – मुंबईकरांच्या पाण्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर पावसाने उसंत घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला असून, गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईत पवई तलाव हा जून महिन्यातच १०० टक्के ओव्हर फ्लो झाला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पण या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

पाणी औद्योगिक वापरासाठी…

दरम्यान, गेल्या दोन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक १८ जून २०२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्या व्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

– बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
– या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.

– या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

– तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लीटर)

– हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.

-गतवर्षी हा तलाव दिनांक ८ जुलै २०२४ रोजी भरून वाहू लागला होता.


About Author

Astha Sutar

Other Latest News