Opposition Leaders : अमरावतीचे… महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर भूषण गवई जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आले, त्यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रोटोकॉल न पाळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर पावसाळी अधिवेशनात सरन्यायाधीशांचा सत्कार केल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढाच सरन्यायाधीशांसमोर वाचला आहे.
विरोधकांचा आवाज दाबला जातोय…
दरम्यान, “आज महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केलेला आहे. आम्ही विरोधी पक्षांकडून विरोधकांचा आवाज कसा दाबला जात आहे याची माहिती त्यांना पत्राद्वारे दिली आहे. शिवाय विरोधी पक्ष नेते पदाची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही हे निदर्शनास आणून दिले. सत्ताधाऱ्यांना आमची भीती का वाटते? या सर्व बाबी आम्ही पत्रातून सरन्यायाधीशांना अवगत केलं आहे. ४ पक्ष दोन पक्षाच्या नावाने सुरु आहेत. हे सगळं निस्तरण्याची गरज आहे. गडबड घोटाळा सरकार आम्हला घाबरतय.” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

७ महिन्यानंतरही सरकारची उदासीनता…
सरकार येऊन ७ महिने झाले तरी अद्यापही महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. महाविकास आघाडीतर्फे आमदार भास्कर जाधव यांचे नाव सुचवण्यात आले आहे. मात्र, अद्यापही या नावाबाबत अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. विरोधी पक्षाने याबाबत सरकारकडे देखील दाद मागितली. मात्र, याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे म्हणून सरकारने टाळाटाळ केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. दोन पक्षाचे सध्या महाराष्ट्रात ४ पक्ष झालेआहेत. राष्ट्रवादीचे २ गट आणि राष्ट्र शिवसेनेचे २ गट असे चार पक्ष आहेत.