सीबीएसईच्या शाळांच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली असली, तरी सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी एक धडा आणि केवळ 68 शब्द देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे. मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास गुंडाळण्याचं काम सीबीएसईने केल्याची भावना इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींमध्ये यामुळे निर्माण झाली आहे.
महाराजांचं कर्तुत्व 68 शब्दांत ?
मराठ्यांचा इतिहास केवळ दोन पानांमध्ये अक्षरशः गुंडाळून टाकला आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वर्णन केवळ अकरा ओळींत करण्यात आले असून, महाराजांबाबत केवळ 68 शब्द आहेत. म्हणजेच, माध्यमिक शाळांमधील मुलांना शिवाजी महाराजांची माहिती केवळ 68 शब्दांमध्ये मिळते आणि तीही कोरडी. त्यामुळे या माध्यमातून शिक्षण घेणारी मुले शिवछत्रपतींच्या चरित्रापासून होणार्या भावनिक, बौद्धिक पोषणापासून दूरच राहतात. याचा दूरगामी, भयंकर परिणाम होण्याची चिन्हे असून, पुढच्या पिढीतील मोठा भाग इथल्या मातीपासून, महान वारशापासून तुटत चालला आहे.

राज्य मंडळांच्या शाळांमधील इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आहे; तर सातवीच्या पुस्तकात 18 व्या शतकातील मराठ्यांच्या साम्राज्याचा आणि समाजसुधारकांचा इतिहास आहे. चौथीच्या पुस्तकाचे मुखपृष्ठच घोड्यावरून दौडणार्या शिवाजी महाराजांच्या देखण्या चित्राचे आहे, तर त्यांच्या जीवनपटातील बहुतेक सर्व रोमहर्षक, तसेच नैतिकमूल्ये सांगणारे प्रसंग संपूर्ण पुस्तकातून मांडण्यात आले आहेत.
राज्यात सीबीएसई पॅटर्न आल्यास काय?
राज्यात या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. यंदा पहिलीपासून ते पुढे टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंत हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. त्यामध्ये 30 टक्के इतिहास हा राज्यातील येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सीबीएसईचा सध्याचा अभ्यासक्रम पाहता येणार्या काळात तयार होणारी जी पिढी आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहास काय होता, हे सांगणे कठीण होणार असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे.
राज्यातील जमिनीवरील आणि सागरी गडकिल्ले याविषयीदेखील संबंधित सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना माहिती नसल्याचे दिसून येते. संबंधित शाळांमध्ये ठराविक महापुरुष सोडले, तर अन्य महापुरुषांच्या जयंती, तसेच पुण्यतिथीदेखील साजरी करण्यात येत नाही. त्यामुळे देशातील संस्कृतीपासूनदेखील ही मुले दुरावलेली पाहायला मिळतात.
इतिहास अभ्यासक, शिवभक्तांमध्ये संताप
या कारणांमुळे इतिहास प्रेमी, अभ्यासक आणि शिवभक्तांमधून मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आगामी काळात राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू झाल्यास त्यामध्ये इतिहासाचं काय होणार? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राज्यात सीबीएसई पॅटर्न आल्यास त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विस्तृतपणे असेल असं सांगितलं जात आहे. यामध्ये शिवरायांच्या जन्मापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचा इतिहास सविस्तर असावा असे मत आहे.