Mumbai Heavy Rains : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असून, त्याचा प्रभाव राज्यभरात दिसून येत आहे. मात्र, याचा सर्वाधिक परिणाम मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. मान्सूनची सुरुवात होताच मुंबईकरांचे जीजनवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुंबईसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम मुंबईच्या लाइफलाइनवर लोकल ट्रेनवर झाला आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे लोकल सेवा बाधित झाल्या आहेत, ज्यामुळे कामावर गेलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लोकल उशिराने धावत आहेत
मध्य रेल्वेच्या सेंट्रल लाईनवर कल्याणकडे जाणाऱ्या स्लो लोकल गाड्या सुमारे ५ मिनिटे उशिराने धावत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या फास्ट लोकल गाड्यांमध्ये ४० मिनिटांचा उशीर नोंदवण्यात आला आहे. स्लो लोकल सेवा देखील सामान्य वेळेपेक्षा सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
एवढेच नाही तर सेंट्रल लाईनवरील भायखळा आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. सँडहर्स्ट रोड आणि भायखळा दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अप आणि डाऊन बाजूच्या लोकल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पावसामुळे हार्बर मार्गावरील सेवाही संथ गतीने सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी, पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ५ मिनिटांपर्यंत विलंब दिसून येत आहे.
पावसामुळे झाडे कोसळून अपघात
फक्त लोकल ट्रेनच नाही, तर मुंबईत नव्याने सुरू झालेल्या अंडरग्राउंड मेट्रो म्हणजेच एक्वा लाईनमध्येही पाणी साचल्याचे दिसून आले. जोरदार पावसामुळे स्टेशनच्या आत आणि प्लॅटफॉर्मवर पाणी शिरले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबई शहरात ४ ठिकाणी आणि पश्चिम उपनगरांमध्ये ५ ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती बीएमसीकडे आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
मुंबईतील कुर्ला, विद्या विहार, सायन, दादर आणि परळ या भागांत सध्या हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे, की पुढील काही तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहू शकतो आणि कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
बीएमसीने नागरिकांना विनंती केली आहे, की अत्यंत गरजेचे असल्यासच घराबाहेर पडावे. सकाळी ९ ते १० या एका तासात सर्वाधिक पाऊस नरिमन पॉईंट फायर स्टेशनमध्ये नोंदवला गेला, जिथे १०४ मिमी पावसाची नोंद झाली.