दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांचे वेग मर्यादित ठेवले जातात. पावसामुळे दृष्यमानता कमी होते आणि आपत्कालीन परिस्थिती ओळखण्यात अडथळे येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, लोको पायलटना जोरदार पावसात गाड्यांचा वेग ताशी ४० किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस ही सध्या आठवड्यात सहा वेळा धावत असलेली सेवा पावसाळी काळात केवळ तीनच दिवस सुरू राहणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.
मुंबई-गोवा वंदे भारतच्या अनेक फेऱ्या रद्द
मध्य व कोकण रेल्वे मार्गांवर पावसाळी सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या तब्बल शंभरहून अधिक फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. 15 जूनपासून 20 ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले असून, याचा थेट परिणाम या जलदगती प्रवासी सेवेवर होणार आहे. अनेक गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

प्रवाशांना मोठा मनस्ताप; अनेक तक्रारी समोर
या गाडीचा नियमित वेळ पुढीलप्रमाणे राहणार आहे: सीएसएमटी-मडगाव सेवा (गाडी क्रमांक 22229) सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी पहाटे 5:25 वाजता मुंबईहून सुटून दुपारी 3:30 वाजता मडगावला पोहोचेल. परतीची सेवा (गाडी क्रमांक 22230) मडगावहून मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी दुपारी 12:20 वाजता सुटून रात्री 10:25 वाजता मुंबईत दाखल होईल. गणेशोत्सव व पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, यंदा जून ते ऑक्टोबरदरम्यान प्रवाशांना बदललेल्या वेळापत्रकाचा सामना करावा लागणार आहे.