कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असतानाच आता विदर्भाची देखील पावसाची प्रतीक्षा संपणार आहे, आज महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. आज कोकण, घाटमाध्यासह विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील तीन ते चार दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाध्यासह विदर्भात आज मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय
काही दिवसांपासून संपूर्ण देशात मान्सूनचा प्रभाव दिसून येत आहे. उत्तर भारतात ढगाळ वातावरण आहे. परंतु दिल्लीत अजूनही हवामान सामान्य आहे. हरियाणा-पंजाबच्या भागात मान्सून दाखल झाल्यामुळे दिल्लीची प्रतीक्षा वाढत आहे. इकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.

विदर्भाची पावसाची प्रतीक्षा संपणार?
कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार घाटमाध्याला ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, कोकणसह पुणे, सातारा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस पुणे, मुंबई, सातारा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
विशेष म्हणजे विदर्भाला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात मध्यम ते मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही बाब विदर्भातील शेतकऱ्यांची दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, कारण पावसाअभावी शेतीच्या कामांना अद्याप वेग आलेला नव्हता.