Manikrao Kokate : यशस्वी शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संचाचा वापर केला पाहिजे. तसेच याचे वितरण करताना त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. शेतकऱ्यांना ही प्रणाली कशी वापरावी याचे प्रशिक्षण या संचाचे वितरण करणाऱ्या साहित्य विक्रेत्यांनी द्यावे, असे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
प्रति थेंब अधिक पीक (ठिबक व तुषार) अंमलबजावणी संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ईरीगेशन असोसिएशनचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी उपस्थित होते.

संच वापरण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे
दरम्यान, ज्या कंपन्या शेतकऱ्यांना याबाबत योग्य ते प्रशिक्षण देणार असतील त्या कंपन्यानाच शासन अनुदान देण्यासंदर्भात प्राधान्यक्रम निश्चित करेल असेही कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. ठिबक व तुषार सिंचन संच शेतात बसविल्यानंतर त्याचा योग्यप्रकारे वापर होणे गरजेचे आहे. तसेच जास्त कालावधीपर्यंत ही यंत्रणा शेतकऱ्यांना वापरता यावी यासाठी हे संच वापरण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. असे कृषीमंत्री म्हणाले.
तुषार सिंचन मोठ्या क्षेत्रांसाठी योग्य
दुसरीकडे या योजनांमध्ये, शेतकऱ्यांना अनुदान आणि सवलती मिळतात. पाणी वाचवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहे, तर तुषार सिंचन मोठ्या क्षेत्रांसाठी योग्य आहे. असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले. या प्रणलीचा वापर केल्यास शेतीत अधिक पीक येऊ शकते. असा विश्वासही माणिकराव कोकटेंनी व्यक्त केला.