Aditya Thackeray – दहावीचा निकाल लागून १ महिना उलटला तरी अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली नव्हती. १३ मे रोजी निकाल लागला, मात्र ऑनलाईन अर्ज प्रणालीत अनेक अडचणी आल्या. दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेत होत असलेल्या विलंबावरून आणि शालेय शिक्षण खात्यात सुरु असलेल्या गोंधळावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत, मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळे ते बोलत होते.
आदित्य ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा…
अकरावी प्रवेशाची पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश झाली. १० जून रोजी जाहीर होणारी पहिली यादी २६ जूनपर्यंत लांबणीवर पडली आणि तीही वेळेत जाहीर झाली नाही. आज यादी लागू शकते किंवा नाही हे देखील निश्चित नाही,पत्रकार परिषद सुरू असतानाच पहिली यादी जाहीर झाल्याचे वृत्त आले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि पहिली यादी जाहीर झाली. दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर आज यादी लागली नाही तर युवासेना राज्यभर आंदोलन करेल आणि दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करेल, असा इशारा त्यांनी दिला.

दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी…
पहिली यादी जाहीर झाली असली तरी, दुसरी यादी ९ तारखेला (९ जुलै) जाहीर होणार असल्याने इतका वेळ कशाला लागतो. या घोळाला जबाबदार कोण आहे? ती कंपनी निवडली कोणी? काही अनुभव नसताना तिला काम का दिले? अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का नाही? असे प्रश्न त्यांनी विचारले. दादा भुसे यांच्याकडून शालेय शिक्षण खाते काढून घ्यावे आणि त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरेंनी केली.
मंत्र्यांनी बौद्धिक घोळ घातला…
शालेय शिक्षण खात्यात जास्तच घोळ घातले आहेत. आताच्या मंत्र्यांनी बौद्धिक घोळ घातला आहे. फडणवीस यांच्या सरकारचे १०० दिवस उलटले आणि ही पॉलिसी केली, ती पॉलिसी केली असे सांगत आहेत. अनेक खात्यात गडबड घोटाळे सुरू आहेत. राज्यात अनेक लोकांचे हाल आहेत, शेतकरी, महिला यांचे हाल होत आहेत. घाणेरडे राजकारण बाजूला ठेवा, स्वतःचे सरकार आणि मंत्रिपद द्यायला २ महिने लागले, हा सगळा घोळ निस्तरायला किती महिने लागणार,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.