‘वारीमुळे रस्ते जाम..’ अबू आझमींचं वादग्रस्त विधान, मुख्यमंत्री म्हणाले..

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याचे तीव्र पडसाद आता उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मुंबई- सध्या राज्यात चर्चा आहे ती आषाढी वारीची.. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह अनेक संतांच्या पालख्या सध्या पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या आहेत. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांनी आज पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. यातच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याचे तीव्र पडसाद आता उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

वारींमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लीम समाज कधी तक्रार करत नाही, मात्र मुसलमानांनी नमाज पठण केलं तर तक्रार होते, असं विधान अबू आझमी यांनी ऐन वारीच्या काळात केल्यानं यावरुन मोठा राजकीय वादंग निर्माण झालाय.

अबू आझमींविरोधात संतापाची लाट

वारी ही महाराष्ट्राची परंपरा मानली जाते. हजारो वारकरी पावसाळ्याच्या काळात पेरण्या संपल्यानंतर आषाढीच्या आधी 15 दिवस देहू, आळंदीत वारीत सहभागी होतात. समभावाचा संदेश घेऊन या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना होतात. सुमारे सातशे ते आठशे वर्षांची ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या वारीबाबत अबू आझमी यांनी हे वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरुन अबू आझमी यांच्यावर टीकेची तोफ डागलीये.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आझमी यांना अनुल्लेखानं मारलंय. अबू आझमी यांना अशी वादग्रस्त वक्तव्य करण्याची आवड आहे, यातून ते प्रसिद्धीच्या झोतात राहतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यांच्या विधानांना प्रतिक्रिया दिली तर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळते, त्यामुळे त्यांचं विधान प्रतिक्रियेच्या लायक नसल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. या प्रशानर उत्तर देणार नाही, अशी परखड भूमिका फडणवीसांनी नागपुरात मांडलीय.

वादग्रस्त वक्तव्यांनी आझमी कायम चर्चेत

अबू आझमी हे यापूर्वीही त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी औरंगजेबाच्या उद्दातीकरणाचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं होतं. आता वारीबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यानं नवा राजकीय वाद आणिआंदोलनं होण्याची शक्यता आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News