Heatwave Alert: राज्यात 29 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा

राज्यात आजपासून 29 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पारा 45 अशांपर्यंत जाण्याच अंदाज आहे.

पुणे: राज्यातील उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला. उष्णतेच्या लाटेने अंगाची लाही लाही होणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेमकी राज्यात सध्या काय परिस्थिती आहे ते समजून घेऊ

विदर्भ, मराठवाडा तापणार!

पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील अनेक शहरांमध्ये पारा वाढणार आहे. वर्धा, यवतमाळ, नागपूर. चंद्रपूरात पारा 45 अंशांच्या घरात  जाण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या झळांनी नागरिक बेजार होतील. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात उष्ण वातावरण असेल. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्ण लाटेचा सामना करावा लागणार आहे.

चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेला आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 45.8 अंश सेल्सिअसवर पोहचले. तर त्या पाठोपाठ विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपूरी या शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांपर्यंत मजल मारली. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राला इशारा

ऐनवेळी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत तापमान समतोल स्वरूपात पाहायला मिळते. परंतु, यंदा काही ठिकाणी पारा 41 अंशांवर  गेला आहे. पुणे शहर देखील तापले आहे. पुण्यात तापमानाने 128 वर्षांचा विक्रम मोडला आहे. पुण्यात बुधवारी म्हणजेच 23 एप्रिलला 43.6 अंश तापमानाची नोंद झाली. यापूर्वी 30 एप्रिल 1897 रोजी 43.3 तापमानाची नोंद झाली होती. 128 वर्षांनी काल तापमानाने विक्रम मोडला आहे.

29 एप्रिल पर्यंत काळजी घ्या

हवामान विभागाने आजपासून ते 29 एप्रिलपर्यत देशातील अनेक भागांना उष्णतेच्या झळा बसतील. पश्चिमी मध्य प्रदेशातील अनेक भागाना उन्हाचा तडाखा बसेल. 23 ते 26 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगा मैदानी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 24 आणि 25 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णतेने कहर केला. उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच दुपारी बाहेर पडावे अन्यथा त्यांनी बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे आणि डोक्यावर रुमाल बांधावा, पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News