प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर यांनी आता बॉलिवूडला रामराम केला असून, एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. गीता कपूर यांनी सहाय्यक कोरिओग्राफर म्हणून आपला करिअर सुरू केला होता. त्यांनी फराह खान यांना ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल तो पागल है’ या चित्रपटांतील गाण्यांमध्ये असिस्ट केलं होतं. मागील अनेक वर्षांपासून त्या विविध डान्स रिअॅलिटी शोजमध्ये जज म्हणून दिसत होत्या. आता गीता कपूर यांना बॉलिवूडमध्ये परतण्याची इच्छा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गीता कपूर यांनी बॉलिवूड का सोडलं?
‘हिंदी रश’ ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा गीता कपूर यांना विचारण्यात आलं, “तुम्ही बॉलिवूडमध्ये केव्हा परत येत आहात? खूप वेळ झाला, खूप ब्रेक घेतलात. आता परत या.” त्यावर गीता म्हणाल्या, “नाही. मला वाटतं की प्रत्येक माणसानं एक पाऊल मागे घ्यावं आणि नवीन टॅलेंटला पुढे येण्याची संधी द्यावी.”

गीता पुढे म्हणाल्या, “आता इतर लोकांना पुढे येण्याचा आणि चमकण्याचा वेळ आहे. या इंडस्ट्रीतून जे काही मिळू शकत होते काम, पैसे, प्रसिद्धी ते सर्व मला मिळालं आहे. पण जर असं काही झालं, जिथे माझा खरंच खूप इंटरेस्ट असेल आणि वाटेल की हे संधी गमावू नये, तर कदाचित मी परत येईन.”
“इंडस्ट्रीमध्ये सध्या कामाची टंचाई आहे”
गीता कपूर म्हणाल्या की, सध्या इंडस्ट्रीमध्ये कामाची खूप टंचाई आहे आणि अशा वेळी इतरांना संधी द्यायला हवी. त्या म्हणाल्या, “सध्या तरी कामाची कमतरता आहेच. सध्या त्या प्रकारच्या फिल्म्स बनत नाहीत जशा आमच्या काळात बनायच्या, जिथे 8-10 गाणी असायची. मोठी गाणी असायची. डान्सिंग नंबर असायचे. तर अशा वेळी आपणही त्या संधींसाठी धडपड करू आणि इतरांना संधीच मिळू देणार नाही, असं नको. मी जिथे आहे, तिथेच आनंदात आहे.”
“कुठल्याही बंधनात राहून काम नको”
गीता कपूर यांनी हेही स्पष्ट केलं की त्या कुठल्याही बंधनात राहून काम करू इच्छित नाहीत. त्यांना क्रिएटिव्ह काम करायला आवडतं, कॉपी-पेस्ट नाही. त्यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं, तर गीता यांनी केवळ 17 वर्षांची असताना सुरुवात केली होती. त्यांनी फराह खान यांच्या ट्रूपमध्ये प्रवेश केला होता.
फराह खान यांना केले असिस्ट
गीता कपूर यांनी फराह खान यांना अनेक चित्रपटांमध्ये असिस्ट केलं आहे, ज्यात ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहब्बतें’, ‘कल हो ना हो’, ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांति ओम’ यांचा समावेश आहे. त्या फराह खान यांना आईचा दर्जा देतात आणि त्यांना आपला गुरु मानतात.