संभाजीनगरच्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार गजाआड, आरोपीचा एन्काऊंटर, मात्र चोरीला गेलेल्या साडे पाच किलो सोन्याचं गूढ कायम

आता या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 10 वर पोहचली असली तरी आत्तापर्यंत केवळ 32 तोळे सोनचं पोलिसांच्या हाती लागलंय. साडे पाच किलो सोनं गेलं तरी कुठं याची चर्चा आता संभाजीनगरमध्ये सुरु आहे.

संभाजीनगर – संभाजीनगरच्या वाळूज परिसरात उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी 15 मे रोजी पडलेला दरोडा चर्चेचा विषय ठरतोय. दरोड्यात साडे पाच किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटल्याची माहिती आहे. हा दरोडा संभाजीनगरमध्ये पडलेल्या आत्तापर्यंत सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर 26 मे रोजी या दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी इन्काऊंटर केला. खोतकरची बहीण आणि वडिलांनी पोलिसांनी सुपारी घेऊन खोतकरचा एन्काऊंटर केल्याचा आरोप केलाय. साडे पाच किलो सोन्याच्या तपास लागलेला नसताना हे आरोप झाल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलंय.

लड्डांचा सख्खा मित्रच निघाला वैरी

संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डांचा सख्खा मित्र बाळासाहेब इंगोले हाच त्यांचा शत्रू असल्याचं आता तपासात समोर आलंय. बाळासाहेब इंगोले हाच या दरोड्याचा सूत्रधार असल्याचं आता सांगण्यात येतंय. त्याला पोलिसांनी अटकही केलीय. लड्डांच्या विश्वासातील असलेल्या इंगोलेनंच दरोड्याची टीप दिल्याचं तपासात समोर आलंय. बाळासाहेब इंगोले हा 20 वर्षांपासून संतोष लड्डांच्या कंपनीत नोकरीला आहे. लड्डांच्या आर्थिक व्यवहारांची इंगोलेला माहिती होती. लड्डांच्या घरीही त्याचं येणं जाणं होतं.

लड्डा परदेशात असताना दरोडा

उद्योजक संतोष लड्डा परदेशात गेलेले असताना आरोपींनी दरोड्याचा प्लान रचला. 15 मे रोजी लड्डा यांच्या घरातून 6 दरोडेखोरांनी साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी लुटली या प्रकरणील पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं तर दरोड्याचा कट आखणारा अमोल खोतकरचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.

सोनं किती याचं गूढ कायम

दरोड्यानंतर 15 मे रोजी पहाटे 4 वाजता सर्व दरोडेखोर साजापूरच्या लॉजवर परतले. 15 मे रोजी सकाळी अमोल खोतकर मैत्रिणीसोबत चेन्नईच्या दिशेने रवाना झाला. त्यानंतर खोतकर पुन्हा महाराष्ट्रात परतला. अमोल खोतकरनं महाराष्ट्रात आल्यानंतर मालेगाव, नाशिक, शिर्डीत मुक्काम ठोकला. 25 मे रोजी अमोल खोतकर संभाजीनगरमध्ये आला, त्यानंतरही 24 तास शहरात फिरत होता. 26 मे रोजी अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाला. आता या प्रकरणातील सर्व आरोपी अटकेत आल्यानंतर तरी साडे पाच किलो सोनं मिळणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चोरीला गेलेलं सोनं हे साडे पाच किलोपेक्षाही जास्त असेल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं सोनं नेमकं किती याचंही गूढ वाढलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News