IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये रविवारी क्वालिफायर-२ सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. अशा प्रकारे पंजाब दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याआधी २०१४ साली टीमने अंतिम सामना खेळला होता.
या सिझनचा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, जिथे पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे.

अय्यरच्या नाबाद ८७ धावा
पंजाब किंग्सच्या ऐतिहासिक विजयात कर्णधार श्रेयस अय्यरचा महत्त्वाचा वाटा होता. अय्यरने ४१ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची दमदार खेळी केली. त्यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.
या सिझनमध्ये अय्यरने आतापर्यंत १६ सामने खेळून ५४.८२ च्या सरासरीने एकूण ६०३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने स६हा अर्धशतके झळकावली आहेत.
यासह अय्यर हा एकमेव कर्णधार ठरले आहेत, ज्याच्या नेतृत्वाखाली ३ वेगवेगळ्या आयपीएल संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. याआधी श्रेयस अय्यरने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि २०२४ मध्ये केकेआरला फायनलमध्ये पोहोचवले होते.
सामन्यात काय घडलं?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावत २०३ धावा केल्या होत्या.
मुंबईकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ४४ धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टोने ३८ आणि नमन धीरने ३७ धावांचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी टीमकडून अजमतुल्लाह उमरजईने सर्वाधिक २ बळी घेतले.
त्याच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने केवळ १९ षटकांतच विजय मिळवला. संघासाठी कर्णधार अय्यरने सर्वाधिक ८७ धावा केल्या. या दरम्यान त्याने नेहल वढेरासोबत चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. मुंबईकडून अश्विनी कुमारने सर्वाधिक २ बळी घेतले.