आयपीएल फायनलला ऑपरेशन सिंदूरचे हिरो उपस्थित राहणार, बीसीसीआयची खास योजना

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकांना आमंत्रित केलं आहे. आयपीएल २०२५ च्या समारोप समारंभादरम्यान ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या ‘शौर्यपूर्ण प्रयत्नांना’ सलाम केला जाईल.

IPL 2025 Final, BCCI, Operation Sindoor : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने या विजेतेपदाच्या लढतीसाठी खास तयारी केली आहे. बीसीसीआयच्या या योजनेवर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. खरं तर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नायकांना आमंत्रित केलं आहे. आयपीएल २०२५ च्या समारोप समारंभादरम्यान ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या ‘शौर्यपूर्ण प्रयत्नांना’ सलाम केला जाईल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे.

देवजीत सैकिया यांची घोषणा

देवजीत सैकिया यांनी मंगळवारी न्यूज एजेंसी पीटीआयशी बोलताना सांगितले, “ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि जवान यांना अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केलं आहे.” सैकिया म्हणाले की बीसीसीआय देशाच्या सशस्त्र दलांच्या ‘शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवे’ला सलाम करते. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या शौर्यपूर्ण प्रयत्नांची’ प्रशंसा केली, ज्यामुळे राष्ट्राचं संरक्षण झालं आणि प्रेरणा मिळाली.

सैकिया पुढे म्हणाले की, या गौरवाच्या प्रतीक म्हणून आम्ही समारोप समारंभ सशस्त्र दलांना समर्पित करण्याचा आणि आपल्या वीरांना सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट हा राष्ट्रीय उत्साह असला तरी आपला देश आणि त्याची सार्वभौमता, अखंडता आणि सुरक्षा याहून मोठं काहीच नाही.

दरम्यान, सध्या जनरल उपेंद्र द्विवेदी हे थलसेना प्रमुख आहेत, तर अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी नौदलाचे प्रमुख आणि एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह हे वायूदल प्रमुख आहेत.

दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती, त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले बहुतेक लोक पर्यटक होते. भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे भारत-पाकिस्तान यांच्यात थोडक्यात सैनिकी संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून संघर्षविरामाची विनंती आल्यानंतर भारताने आपले ऑपरेशन थांबवण्यास सहमती दर्शवली होती.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News