सांगलीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा फक्त एक औपचारिकता म्हणून राहिला होता. शेवटी आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अधिकृतरित्या सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आता चंद्रहार पाटलांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर या घटनेवर खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे,
स्वार्थासाठी बेईमानी केली, राऊतांची सल
चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढावी अशी इच्छा होती. त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, अशी सल संजय राऊत यांनी व्यक्त केली. अशा माणसानं स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमान व्हावं, हीच तर बेईमानी आहे. काय कमी केलं. ठीक आहे सत्ता आली नाही. तुमच्या गावात तुम्हाला मतं पडली नाहीत, असा घणाघात राऊतांनी चंद्रहार पाटील यांना घातला. ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, त्याने सुद्धा बेईमानी करावी. या बेईमानीचे वर्णन काय करावं असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या मनात खंत
पैलवान चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावरून महाविकास आघाडीत कमालीची धुसफूस उभ्या महाराष्ट्राने पाहिली होती. काँग्रेससोबत त ठाकरे गटाचे मतभेद टोकाला गेले होते. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होते. त्यानंतर पाटील यांना शिंदे गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. य़ा घटनेची खंत सध्या संजय राऊतांच्या मनात आहे.