दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्यासाठी १० जूनचा मुहूर्त? सुप्रिया सुळेंनी दिली हिंट

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना आता सुप्रिया सुळेंनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. नेमकं सुळेंनी काय म्हटलं, त्यांनी काय हिंट दिली? जाणून घेऊ...

पुणे: राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याचे मनोमिलन होणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा आशयांच्या चर्चेने बऱ्याच काळापासून जोर धरला होता. त्यात आता मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रिया सुळेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला अनुसरून मोठी हिंट दिली आहे. नेमकं काय घडतंय, 10 जूनला राज्यात काही मोठी उलथापालथ होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुप्रिया सुळेंची काय हिंट?

10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन उद्या (10 जूनला) सकाळी 10.10 वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन, येथे ध्वजारोहण होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाचा मेळावा सकाळी 10.30 ते 1.10 या वेळेत होईल.

काका-पुतणे एकत्रित आल्यास…

जर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. दोघांचं एकत्र येणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ अधिक वाढणं. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही दबाव वाढू शकतो. शरद पवारांचा अनुभव आणि अजित पवारांची प्रशासकीय क्षमता एकत्र आल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढू शकतो. भाजप आणि काँग्रेस यांना नव्याने रणनीती ठरवावी लागेल. ग्रामीण भागात आणि मराठा मतदारांमध्ये त्यांची पकड अधिक मजबूत होऊ शकते. हे राजकीय समीकरण महाराष्ट्रात सत्ता समिकरण बदलवू शकते. मात्र, यासाठी पक्षांतर्गत विश्वास आणि स्थिरता टिकवणं महत्त्वाचं ठरेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News