‘देशात लोकांच्या जीवाची किंमत नाही’…मुंबई लोकल अपघातावर राज ठाकरेंचं भाष्य

मुंबईत आज स्थानिक रेल्वेचा भयंकर अपघात झाला. या भीषण अपघातात काही लोकांनी जीव देखील गमावला, त्यानंतर या घटनेवर आता राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 प्रवासी रेल्वेमधून ट्रॅकवर पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते, त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. त्यामुळे, झालेल्या अपघातात 13 प्रवासी खाली पडले आणि 4 जणांचा मृत्यू झाला. या भयावह अशा रेल्वे अपघातावर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता राज ठाकरेंनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, रेल्वेमंत्र्यांना तिथं जाऊन परिस्थिती बघू द्या,  मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे,’ अशा तिखट आणि खोचक शब्दांत राज ठाकरे यांनी आपली पतिक्रिया दिली आहे.

मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्कींग व्यवस्था नाही. केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, अशा शब्दात राज यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

नेमकं अपघातावेळी काय घडलं?

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झाला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करत होते, असं रेल्वेच्या पीआरओंनी सांगितलंय. “हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभे होते आणि गर्दीत त्यांना एकमेकांचा धक्का लागला. त्यातून त्यांचा तोल ढासळल्याचं समजतंय. रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती दिली. लोकलमधील आठ ते नऊ प्रवासी रुळावर पडले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर 9.50 च्या सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या. आता या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडून कसून तपास सुरू आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News