मुंबईजवळील मुंब्रा रेल्वे स्टेशनदरम्यान झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन लोकलमध्ये कमी अंतर आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळणादरम्यान सीएसएमटीला जाणाऱ्या आणि खचाखच भरलेल्या लोकलमधून ११ प्रवासी ट्रॅकवर पडले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या घटनेनंतर मुंबईकरांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या मुंबई लोकलचं वास्तव पुन्हा अधोरेखित झालं आहे. तिन्ही रेल्वेमार्गात मध्य रेल्वेवर कायम गर्दी असते. येथील लोकसंख्येच्या तुलनेत विविध कारणांमुळे लोकलच्या फेऱ्या तुलनेने कमी आहेत. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणीकरूनही लोकलच्या फेऱ्या वाढ होत नसल्याचं चित्र आहे. यातूनच अपघातात दररोज कित्येक जणांचा हकनाक बळी जातो.

मुंबई उपनगरीय रेल्वे (मध्य आणि पश्चिम रेल्वे) मधील अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या गंभीर
– 2024 मध्ये एकूण 2,468 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच मुंबईत दररोज सरासरी 7 प्रवाशांचा हकनाक बळी जातो. यापैकी 1,151 मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना (ट्रेसपासिंग) झाले, तर 590 मृत्यू चालत्या गाडीतून पडून झाले आहेत.
-2023 मध्ये 2,590 मृत्यू नोंदवले गेले, म्हणजेच दररोज सुमारे 7 मृत्यू. यापैकी 1,277 मृत्यू रुळ ओलांडताना आणि 590 मृत्यू गाडीतून पडून झाले.
– गेल्या 20 वर्षांत 2005 ते 2024 या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून 52,300 मृत्यू झाले, म्हणजे सरासरी वर्षाला 2,615 मृत्यू झाल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेवर 29,321 आणि पश्चिम रेल्वेवर 23,000 मृत्यू नोंदवले गेले आहेत.
अपघाताची मुख्य कारणं काय आहेत?
1. रुळ ओलांडणे (Trespassing) : सर्वात मोठे कारण, विशेषतः ठाणे, कल्याण, बोरीवली यांसारख्या भागात.
2. चालत्या गाडीतून पडणे: गर्दीमुळे प्रवासी दारात लटकतात, ज्यामुळे अपघात होतात.
3. इतर: प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील अंतर, विजेचा धक्का, रुळाजवळील खांबांना धडकणे, आत्महत्या आणि नैसर्गिक कारणे