जगातील चिप प्रमुख बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इंटेल (Intel) ने जुलै 2025 पासून आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील 15 ते 20 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते, आणि ही कपात इंटेलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लेऑफपैकी एक मानली जात आहे.
फॅक्टरी आणि रिसर्च टीमवर परिणाम

ही कपात इंटेलच्या फाउंड्री डिव्हिजनवर होणार असून, यामध्ये कंपनीच्या 15 फॅब प्लांट्सचा समावेश आहे. यात फॅक्टरी टेक्निशियनपासून ते नवीन चिप डिझाइन करणारे रिसर्चरही सामील आहेत. त्यामुळे ही कपात तळागाळातील कर्मचाऱ्यांपासून ते उच्च पदांवरील तज्ञांपर्यंत लागू होऊ शकते.
बायआउट किंवा रिटायरमेंट नाही
या वेळेस इंटेल कोणालाही स्वैच्छिक रिटायरमेंट किंवा बायआउट पर्याय देणार नाही. ज्यांचा परफॉर्मन्स कमकुवत आहे, किंवा ज्यांची गरज कंपनीला उरलेली नाही, अशांच्याच नोकऱ्या जातील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
नवीन CEO ची कठोर रणनीती
मार्च 2025 मध्ये आलेले नवीन CEO लिप-बू टॅन यांनी कंपनीत मोठे बदल सुरू केले आहेत. त्यांचा विश्वास आहे की कमी लोकांकडून अधिक आणि उत्तम काम करून घेता येते. एप्रिलमध्ये त्यांनी संपूर्ण इंटेलमध्ये 20% कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. आता त्याच धोरणाअंतर्गत फाउंड्री डिव्हिजनमध्ये कारवाई सुरू झाली आहे.
एका वर्षात तिसरी मोठी नोकर कपात
• ऑगस्ट 2024: 15,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला
• 2025 ची सुरुवात: आणखी 20% कपातीची योजना
• जुलै 2025: फॅक्टरी स्तरावर तिसरी कपात
कोण वाचेल, कोण नाही?
• ज्यांचं काम क्रिटिकल टेक्नोलॉजी, लिथोग्राफी, किंवा इनोव्हेटिव्ह रिसर्चशी संबंधित आहे, त्यांना अजून तरी धोका नाही.
• पण, ज्यांचं काम ऑटोमेशनने बदललं आहे किंवा प्रोजेक्ट बंद झालाय, त्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर येऊ शकतं.
एवढ्या मोठ्या कपातीचं कारण काय?
• 2025 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला $821 दशलक्षांचा तोटा
• अमेरिकन सरकारकडून मिळणारी $7.9 अब्जची रखडलेली सबसिडी
• AI, डेटा आणि चिप क्षेत्रात Nvidia सारख्या कंपन्यांकडून कडवी स्पर्धा
या सर्व कारणांमुळे इंटेलला खर्च कमी करण्याची आणि जलद निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
इंटेल पुन्हा उभारी घेईल का?
ही कपात कठोर असली, तरी कंपनीची अपरिहार्यता दर्शवते. हजारो कुटुंबांवर याचा परिणाम होणार आहे. आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, ही नोकर कपात कंपनीला पुन्हा नफ्याच्या वाटेवर आणेल, की परिस्थिती आणखी बिकट करेल?