ऑपरेशन ‘सिंदूर’बाबत धक्कादायक खुलासे, भारतावर हल्ल्याचा पाकचा कट; भारत सरकारच्या पत्रकार परिषदेत माहिती

ऑपरेशन सिंदूरबाबत आता अनेक प्रश्न जिज्ञासेपोटी विचारले जात असताना भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाने आता एक पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मिरातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत, यामध्ये काही दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय हवाई सेनेने एअरस्ट्राईक केला . त्यानंतर या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याबाबत आता भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे समोर आले आहे.

‘भारतावर हल्ला करण्याचा पाकचा कट’

नॅशनल मीडिया सेंटरमधून भारत सरकारच्या पराराष्ट्र विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अनेक धक्कादायक खुलासे आणि माहिती समोर आली आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, ‘ आज झालेली ऑपरेशन ‘सिंदूर’ एअरस्ट्राईक पूर्वनियोजित आणि योग्य पद्धतीने केलेली होती. ही एअरस्ट्राईक यशस्वी झाली. त्याचबरोबर ज्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिक मारले गेले, त्या पाठीमागे पाकिस्तानने पोसलेल्या लष्कर ए तोयबा याच संघटनेचा हात आहे. टीआरएफ ही संघटना त्यांच्याशी संबंधित आहे. शिवाय आगामी काळात भारतावर कुरघोड्या अथवा हल्ले करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे असल्याचा गुप्त रिपोर्ट आमच्याकडे आहे.’ अशी माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली आहे.

काश्मिरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न

‘काश्मिरमध्य गतवर्षी 2.5 कोटी पर्यटकांनी यात्रा केली होती. काश्मिर जागतिक पातळीवरील प्रमुख पर्यटन केंद्र बनत असताना ही शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता,’ असं देखील परराष्ट्र सचिवांनी म्हटलं आहे. याबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ‘ज्या प्रकारे निष्पाप नागरिकांना त्यांच्या परिवारासमोर गोळ्या झाडण्यात आल्या…ठार करण्यात आलं, ही बाब निंदनीय होती. लोकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी ते कृत्य केलं गेलं होतं’ असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे.

लष्कराकडून अधिकृत माहिती

‘काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे. ही ठिकाणं भारतावर हल्ल्यांची आखणी आणि मार्गदर्शनासाठी वापरली जात होती.’ अशा शब्दांत भारतीय सेनेकडून माहिती देण्यात आली आहे.

‘ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी आणि अशांतता न घडवणारी होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड व कारवाईची पद्धत ठरवताना अत्यंत संयम दाखवला आहे. ही पावले पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आली आहेत. या हल्ल्यात 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. आपण या घटनेमागे जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्याच्या आपल्या वचनाशी प्रामाणिक राहतो.’


About Author

Rohit Shinde

Other Latest News