अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे लवकरच या अपघाताच्या संभाव्य कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचे विमान अहमदाबाद येथे कोसळले. त्यात 242 प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचा जीव गेला. त्यामुळे हवाई वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? असा सवाल करत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांनी उपस्थित केलेला सवाल महत्वाचा मानला जात आहे.
राऊत नेमकं काय म्हणाले?
ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. देशातील आणि परदेशातील अनेक एजन्सी सध्या अपघाताचा एकत्रित तपास करत आहेत. ब्रिटनचं पथक आले आहे. पोर्तुगालचे पथक आले आहे. अमेरिकेतील बोईंग कंपनीची टीम आलेली आहे. आपल्या काही एजन्सी आहेत. त्याच्यामुळे याविषयावर मी मत मांडणं योग्य होणार नाही.

पण ड्रीमलायनरबाबत जेव्हा करार झाला होता. तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यासंदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानाची क्षमता, इंजिन याविषयी भाजपने शंका घातली होती. UPA च्या काळात या विमानांची खरेदी झाली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते. त्यांनी वारंवार त्याविषयीचा खुलासा केला होता.
सायबर हल्ल्याने इंजिने बंद पाडली?
‘नेमका हा अपघात घडला कसा? हा जगातील एव्हिएशन क्षेत्राला पडलेला प्रश्न आहे. 30 सेकंदात हे घडलं कसं? हा प्रश्न आहे. एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी? कोणी सायबरच्या माध्यमातून विमानाची यंत्रणा हायजॅक केली का? असे अनेक प्रकार समोर येत आहेत. आपण त्यातील तज्त्र नाही. पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत. ती गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प करण्यात येते. अनेकदा लष्कराचे नेटवर्क ठप्प करण्याचा प्रयत्न होतो. यंत्रणा तपास करत असताना त्यावर आताच काही बोलणं योग्य नाही. या अपघातात 300 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. माझ्या मनात काही शंका आहेत, पण त्या आताच व्यक्त करून गोंधळ उडवणे योग्य नाही,’ असं संजय राऊत म्हणाले.