Shrikant Shinde – आफ्रिकेतील चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात देशातील सर्वच नेत्यांनी एकजूट दाखवायला हवी. जगाला भारत एक आहे हे दाखवले पाहिजे. त्याऐवजी विरोधक राजकारण करताहेत. पंतप्रधानांवर केलेलं विधान हे राजकारणात खूपच अपरिपक्व असल्याचं म्हणत, खा. श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
त्याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे…
दरम्यान, भारतीय खासदारांची शिष्टमंडळांनी ३२ ते ३४ देशांचा दौरा केला. या देशांनी भारताला चांगला प्रतिसाद मिळाला. भारताबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आदर दिसून आला. कारण त्यांच्या अडचणीच्या काळात भारत त्यांच्या बाजूनं उभा राहिला होता. मात्र विरोधकांना या गोष्टीत राजकारण करायचे आहे. राहुल गांधी यांना राजकारणात अजून समज यायची आहे, ते खूपच अपरिपक्व नेते असल्याने अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतात. काँग्रेस सरकारच्या काळात भारतात इतके दहशतवादी हल्ले का झाले, त्याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान खासदार डॉ. शिंदे यांनी दिले.

पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोसतोय…
दुसरीकडे खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. खासदार डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने यूएई, काँगो प्रजासत्ताक गणराज्य, सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या देशांचा दौरा केला. पाकिस्तानकडून दहशतवादाला दिले जाणारे प्रोत्साहन त्यांना दिली जाणारी ट्रेनिंग आणि दहशतवादी हल्ले, ऑपरेशन सिंदूर याविषयी प्रत्येक देशात जाऊन सविस्तर सांगण्याची संधी मिळाली. पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोसतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.