आजकाल व्हॉट्सअॅप किंवा SMS वर “घरबसल्या पैसे कमवा” असे मेसेज येणे सामान्य झाले आहे. अनेकजण हे मेसेज दुर्लक्षित करतात, पण काहीजण लाोभाखातर यावर विश्वास ठेवतात, आणि मग त्यांच्या सोबत घडतो मोठा फसवणुकीचा प्रकार. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे एका व्यावसायिकाने अशाच आमिषाला बळी पडून तब्बल १२ लाख रुपये गमावले आहेत.
ऑनलाइन टास्कचं आमिष आणि लाखोंची फसवणूक
घटनेची सुरुवात एका सामान्य व्हॉट्सअॅप मेसेजने झाली. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की काही सोपे ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमवता येतील. सुरुवातीला व्यावसायिकाला काही सोप्पे टास्क दिले गेले. जसं की गुगल मॅपवर हॉटेल रेट करणे किंवा एखाद्या लिंकवर क्लिक करणे. हे टास्क केल्यानंतर त्याला १०० ते १५० रुपये तत्काळ ट्रान्सफर करण्यात आले. यामुळे त्याचा विश्वास बसला की हे खरोखरच ऑनलाइन काम आहे.

यानंतर त्याला टेलीग्रामवरील एका ग्रुपमध्ये सामील करण्यात आले, जिथे “मर्चंट टास्क” नावाचे अधिक मोठे टास्क मिळू लागले. पण हे टास्क पूर्ण करण्याआधी पैसे भरावे लागतील, असं सांगण्यात आलं. छोट्या टास्कमधून आधी पैसे मिळाल्यामुळे त्याला वाटलं की हा पुढचा टप्पा आहे आणि त्याने पैसे पाठवायला सुरुवात केली.
सापळ्यात अडकत गेला
फक्त काही तासांतच फसवणूक करणाऱ्यांनी वेगवेगळे बहाणे करून त्या व्यावसायिकाकडून अनेक हप्त्यांत पैसे मागितले. दोन दिवसांत त्याने जवळपास ११.५ लाख रुपये गमावले. शेवटी जेव्हा त्याला संशय आला आणि त्याने आपले पैसे मागितले, तेव्हा त्याला ब्लॉक करण्यात आले. आता टेलीग्राम ग्रुपकडूनही काहीच प्रतिसाद येत नाही आणि तो नंबरही बंद आहे.
अशा स्कॅमपासून कसं वाचाल?
सतर्क राहा आणि या गोष्टी लक्षात ठेवा:
अनोळखी मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा.
कोणत्याही लिंकवर विचार न करता क्लिक करू नका, विशेषतः जर ती पैसे कमावण्याचे आश्वासन देत असेल.
जे टास्क पूर्ण करण्याआधीच पैसे मागतात, ते फसवणूक असण्याची शक्यता असते.
तुमचे बँक डिटेल्स, आधार किंवा पॅन कार्ड अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
टेलीग्राम किंवा व्हॉट्सअॅपवरील अनोळखी ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका.
सावधगिरीच खरी सुरक्षा
जर एखाद्या ऑफरबद्दल जरा तरी शंका वाटत असेल, तर त्वरित जाणकाराकडे सल्ला घ्या किंवा पोलिसांना माहिती द्या.
ऑनलाइन टास्क आणि जॉबच्या नावाखाली चालणारा हा नवीन स्कॅम लोकांची मेहनतीची कमाई एका क्षणात लुबाडून नेत आहे. तुम्हालाही असा काही मेसेज आला, तर तात्काळ सतर्क व्हा, कारण सावधगिरीच खरी सुरक्षा आहे.