मुंबई: काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने अवघा देश सुन्न झाला आहे. जवळपास 30 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीयं. यावर आता अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाहांवर टीकेची तोफ डागली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
‘कलम 370 हटवल्यानंतर काश्मिर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवण्याची भाषा भाजवाले करत होते. पण, काश्मिरला स्वर्ग बनवण्याचा नादात लोक स्वर्गात गेले, मोदी, शाहांना लोकांनी स्वर्गात पाठवलं.’ अशी आक्रमक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. “राज्यकर्ते सर्वपक्षीय बैठक घेण्याची भाषा करत आहेत, सर्वपक्षीय बैठक घेऊन काय करणार? गृहमंत्री राजीनामा देणार असतील, तर त्या बैठकीला अर्थ आहे. हे राज्यकर्ते नाहीत, अंडरवर्ल्ड टोळ्या चालवणारे लोक आहेत” अशी सणसणाटी टीका राऊतांनी अमित शाहांवर केली.

एकनाथ शिंदेंना राऊतांचं आव्हान
“एकनाथ शिंदे म्हणतात जशास तसं उत्तर दिलं जाईल. हे हास्यास्पद आहे. एकनाथ शिंदे काय करणार? त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर जाणार का?. एकनाथ शिंदे दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. अमित शाह त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. या देशाच्या इतिहासातले अपयशी गृहमंत्री आहेत. गुंडागर्दी करुन देश चालत नाही. धार्मिक द्वेषाच्या राजकारणाचा हा परिणाम आहे” असं संजय राऊत म्हणाले.
पहलगाममध्ये काय घडलं?
पहलगाममधील बैसरन याठिकाणी मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. काश्मीरमधील पहलगाम हे पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोरं हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखलं जातं. ज्याठिकाणी पर्यटक निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी, आल्हाददायक वातावरणात फिरण्यासाठी येतात, त्याठिकाणी मंगळवारी दुपारी रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आणि टाहो फोडणारे त्यांचे नातेवाईक.. हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पहायला मिळालं. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधून गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं.