इंडिगो विमानाचे दरवाजे झाले लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेते विमानात अडकले, नेमकं काय घडलं? वाचा

अहमदाबाद विमान अपघातानंतर विविध एअरलाइन्सच्या विमानांमध्ये कधी तांत्रिक बिघाड तर कधी उशीर अशा बातम्या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान आता छत्तीसगडमधील रायपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दिल्लीहून रायपूरला पोहोचलेल्या इंडिगो फ्लाइटचे दरवाजे तांत्रिक बिघाडामुळे दीर्घकाळासाठी लॉक झाले. त्यामुळे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेते विमानाच्या आतच अडकून पडले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही इंडिगो फ्लाइट दिल्लीहून रायपूर येथे पोहोचली होती. ही फ्लाइट रायपूरमध्ये दुपारी 2.25 वाजता लँड झाली. मात्र विमान लँड झाल्यानंतर त्याचे दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे प्रवासी सुमारे 40 मिनिटे विमानात अडकून राहिले. या प्रवाशांमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार चातुरी नंद आणि रायपूरच्या महापौर मीनल चौबे यांचा देखील समावेश होता.

विमानाचे दरवाजे का झाले लॉक?

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमध्ये इंडिगो फ्लाइटचे दरवाजे तांत्रिक बिघाडामुळे लॉक झाले होते. सुमारे 40 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर दरवाजे उघडण्यात यश आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत अद्याप भूपेश बघेल यांच्याकडून कोणताही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. विमानात कोणीही जखमी झाल्याची किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची माहिती मिळालेली नाही. विमानतळातील सूत्रांनी सांगितले की, भविष्यातील उड्डाण सुरक्षेसाठी विमानाची सखोल तपासणी केली जाईल.

मंगळवारी विमानात बॉम्बची धमकी

यापूर्वी मंगळवारी मस्कटहून कोचीला पोहोचलेली आणि नंतर दिल्लीसाठी रवाना झालेल्या इंडिगोच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. ही धमकी अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली होती. या विमानात 157 प्रवासी आणि चालक दलाचे 6 सदस्य होते. या धमकीनंतर विमानाची तपासणी करण्यासाठी ते नागपूर विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News