एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांनी फिरवली पाठ; तीन महिन्यात 20 लाख प्रवासी घटले!

भाडेवाढीच्या कारणामुळे आणि सेवेतील त्रुटींमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाल्याची बाब समोर आली आहे. काही लाखांनी प्रवासी संख्येत घट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

एमपीएसटी (MSRTC) बस सेवेचे महाराष्ट्रातील महत्त्व खूप आहे. ती ग्रामीण व शहरी भागांना जोडते. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना परवडणारी वाहतूक उपलब्ध करून देते. आपत्कालीन परिस्थितीतही ही सेवा उपयुक्त ठरते. ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु आता सातत्याने होणारी भाडेवाढ आणि सेवेतील त्रुटी यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तीन महिन्यांत 20 लाख प्रवासी घटले!

एसटीच्या प्रवाशांची संख्या आता रोडावली आहे. एसटीची अवेळी बस सेवा, नादुरुस्त बसेस आणि त्यातच झालेली भाडेवाढ, यामुळे प्रवासी हैराण झाले असून त्यांनी एसटीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, गेल्या अडीच महिन्यांत एसटीच्या प्रवाशांची संख्या 20.62 लाखांनी कमी झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एसटीमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, यावर्षी चित्र वेगळे आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बसची संख्या वाढवूनही, एप्रिल ते जून 2025 या कालावधीत प्रवाशांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा देणे एसटीला शक्य होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 एप्रिल ते 15 जून हा काळ एसटीसाठी गर्दीचा हंगाम असतो, कारण या काळात लग्नसराई आणि शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात, ज्यामुळे प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या हंगामात एसटीला सर्वाधिक उत्पन्न मिळते.

लालपरीच्या उत्पन्नात देखील झाली घट

राज्यभरात एसटीचे एकूण 31 विभाग व 251 आगार आहेत. यापैकी ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारखे मोठे विभाग सातत्याने तोट्यात आहेत. एसटी कर्मचारी संघटनेच्या मते, फायद्यातील आगारांचे कौतुक करणे आणि तोट्यातील विभागांना कारणे दाखवा नोटीस पाठवणे, असे एसटी महामंडळात सुरू आहे. तोट्यातील आगारांसाठी एसटी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, परिणामी 15 टक्के भाडेवाढ होऊनही एसटी सातत्याने तोट्यात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांची आवडती राहिलेली एसटी बस सेवा आणि महामंडळ आता डबघाईला येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत एसटीचे भाडे आणि सेवेतील त्रुटी यावर महामंडळाला आणि संबंधित व्यक्तींना प्रकर्षांने विचार करावा लागणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News