Pratap Sarnaik – एकिकडे राज्यातील लालपरी अर्थात एसटी डबघाईत आहे, त्यामुळं त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या जाताहेत, तर दुसरीकडे एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई – बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.
चालकांवर बारीक लक्ष असणार…
दरम्यान, गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील. तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई- बसेसमध्ये असणार आहे. नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली.

१ हजार ई- बसेस घेण्याचा निर्णय…
या ई-बसेस देखील ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सरनाईक म्हणाले.