राज्यातील अनेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस; दुबार पेरणीचे संकट टळले!

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत आता समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. शिवाय शेतीच्या कामांना देखील गती मिळाली आहे. सविस्तर जाणून घेऊ..

राज्यात मधल्या काळात पावसाने मोठा ब्रेक दिल्याने दुबार पेरणीची शेतकऱ्यांना भीती होती. गेल्या 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. नांदेडमध्ये मागील 24 तासांत जिल्ह्यातील 95 पैकी तब्बल 39 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. दमदार पडलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के पेरण्या झाल्या असून, उर्वरित 40 टक्के पेरण्यांना आता वेग येणार आहे. फक्त नांदेड जिल्ह्यात ही परिस्थिती राज्यातील बहुतांश भागात सध्य स्थितीला ही परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

दुबार पेरणी टळली; शेतकरी समाधानी

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवस झाले जोरदार पाऊस होत आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील ३९ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. यात माहूर मंडळात १५६ एवढ्या विक्रमी मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्या व नाल्यांना पूर आला आहे. अवकाळी पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी ५० टक्के पेरण्या केल्या होत्या. दरम्यान पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. पावसाने दडी मारल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील २४ तासांत नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट सध्यातरी टळले आहे.

विदर्भातील जिल्ह्यांत पावसाची हजेरी

याच पुराचा फटका मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला बसला आहे. विदर्भातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव परिसरातील शेकडो एकर शेतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे सोयाबीन, हळद, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील येवती मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.

आज विदर्भात पुन्हा पावसाचा अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना आता चांगलीच गती मिळणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News