कोकणातील सर्व जिल्ह्यांत मान्सूनचा पाऊस बरसत आहे. मुंबई शहर, ठाण्यालाही पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. तरी विदर्भात पाऊस अद्याप तितक्या ताकदीने सक्रिय झालेला नाही. परंतु लवकरच मान्सून विदर्भात प्रवेश करेल आणि नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरांत पाऊस कोसळेल असा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊयात…
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे आज रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात, सातारा जिल्हा परिसरात आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
मान्सूनची लवकरच विदर्भात एंट्री
तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागपूर, विदर्भ परिसरात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवार या चार दिवसांदरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता विदर्भवासियांना पावसामुळे चांगला दिलासा मिळणार आहे. या पट्ट्यातील शेतीच्या कामांना देखील वेग मिळणार आहे. बऱ्यात काळापासून या भागातील शेतीची कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे आता नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे.
16 जून 2025 के लिए मौसम की चेतावनी #weatherupdate #IndiaWeather #weatherforecast #Lightning #Rainfall #thunderstorm #monsoon2025 #IndiaWeather #mausam@moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/7ENZ2YG3fE
— India Meteorological Department (@Indiametdept) June 15, 2025