Nitesh Rane : केंद्रात मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत, याबाबत भाजपाकडून विविध विकासकामाची माहिती देण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ११ वर्षांत देशातील मत्स्य उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. भारतातील अन्न उत्पादनातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून मत्स्य उत्पादन क्षेत्राकडे पहिले जाते. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 8 टक्के असून, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनला आहे. असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटले.
भारताच्या निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ…
दरम्यान, देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान असून राज्य मत्स्यव्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी मिळाल्याने जागतिक मत्स्यपालनात भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 8 टक्के असून भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने तब्बल 60,523.89 कोटी रुपयांचे 17,81,602 मेट्रिक टन (MT) सीफूड निर्यात केले आहेत. यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्याच्या मत्स्योत्पादन मोठी वाढ…
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या काळात देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्याचे एकूण मत्स्योत्पादन ४६३७५८ मे. टन इतके झालेले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा-२०२१) अंतर्गत होत असलेली प्रभावी अंमलबजावणी तसेच ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे राज्यातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सागरी मासेमारी संबंधी सर्वच उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून भविष्यात राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.