Maruti Chitampally passes away – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ, ज्येष्ठ लेखक, वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्राचा अरण्यऋषी अशी ओळख असणारे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 93 वर्षी सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच 30 मार्च रोजी त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने आपण एक पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना आणि हळहळ व्यक्त होत आहे.
जंगल आणि पक्ष्यांविषयी प्रचंड ओढ…
सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना त्यांच्या जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या प्रचंड ओढ होती. त्यांच्या या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला त्यांनी वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतानाच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी पक्षी कोष तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत आणि जंगलात भटकंती केली. स्वत:ला वाहून घेतले.

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही भूषवले
मारुती चितमपल्ली यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर २० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली होती. ६ दशकांहून अधिक काळ मराठी लेखल, वन्यजीव संशोधन आणि पर्यावरण जागरुकता केली होती. विशेष म्हणजे त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही भूषवले होते. मराठी आणि इतर भाषांमधील पक्षी, प्राणी (प्राणी कोष) आणि झाडे (वृक्ष कोष) आदी शब्दकोषांचे काम केले होते.
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी – मुख्यमंत्री
निसर्गाला शब्दरूपांनी साजिवंत करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदे विषयीच्या अक्षरधनाची भर घालून, आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारूती चितमपल्ली अजरामर राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.