यंदा महाराष्ट्रात मान्सून नियोजित वेळेच्या १५ दिवस आधी दाखल झाला, ज्यामुळे २४ मे ते २७ मे दरम्यान राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. मान्सून साधारणपणे ११ जूनच्या सुमारास येतो, परंतु यावेळी तो २५ मे रोजी सिंधुदुर्ग आणि २६ मे रोजी मुंबईत पोहोचला.
दरम्यान, आज (२८ मे) आयएमडीने ताजी माहिती दिली आहे. यानुसार मान्सून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण कोकणात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयएमडीने दिलेली माहिती –
- मॉन्सूनने बुधवार (२८ मे २५) मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांना व्यापलं. पुणे, सोलापूरच्या पुढे मॉन्सून अहमदनगर, बीड, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचला.
- मॉन्सूनच्या प्रगतीची उत्तरेसीमा सध्या मुंबई, अहमदनगर, आदिलाबाद, दंतेवाडा, रायगड, अगरतला, गोलपाडा येथेून जात आहे.
- ओडिशा किनारपट्टीजवळ ठळक कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती. पुढील २४ तासांत उत्तरकडे सरकताना या क्षेत्राची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार आहे.
- मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण ३० मेपासून कमी होणार आहे.
कोकणात धो-धो पाऊस, तर इतरत्र जोर ओसरणार
येत्या दोन दिवसात राज्यातील कोकण वगळता इतर भागांतील पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाने सांगितले. आज (२८ मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरू लागेल. या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर कोकणातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.