कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु रेल्वे पर्यायांच्या अभावामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. सध्या कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत रेल्वे यशस्वीपणे धावत आहे. या मिनी वंदे भारत 2.0 रेल्वेचे उद्घाटन 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले होते.
आता लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या रेल्वेची मागणी प्रबळपणे मांडण्यात आली होती आणि रेल्वे प्रशासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या 15 दिवसांत ही रेल्वे कोल्हापूर टर्मिनसवरून सुरू होण्याची शक्यता आहे.

मोठ्या पाठपुराव्यानंतर मंजूरी
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी बैठकीत कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वेची मागणी पुन्हा मांडली. त्यांनी ही रेल्वे सकाळच्या वेळेत मुंबईला सोडावी, असे सुचवले. या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही या मागणीसाठी विशेष पाठपुरावा केला. ही वंदेभारत मंजुर करण्यात आली आहे. ही नवीन वंदे भारत रेल्वे आठ डब्यांची असेल आणि 550 प्रवाशांना वाहून नेईल अशी माहिती बियाणी यांनी दिली.
प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
नवीन वंदे भारत रेल्वेमुळे कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल आणि लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बियाणी यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर ते मुंबईसाठी प्रवाशांना रेल्वेच्या अपुऱ्या सुविधांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. या नव्या रेल्वेमुळे व्यापारी, नोकरदार आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. शिवाय वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे प्रवाशांच्या वेळेची देखील मोठी बचत होत असते , या आणि अशा अनेक अंगांनी या नव्या वंदे भारतचे महत्व मोठे आहे.