जळगाव शहराच्या हद्दवाढीचा विषय आगामी महापालिका निवडणुकांनंतरच मार्गी लागण्याची शक्यता आहे, जळगाव महापालिकेच्या हद्दीचा पुनर्विचार करून शहर विकास आराखड्यात आसपासच्या गावांचा समावेश करणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या वस्त्या, संस्था आणि उद्योगधंद्यांना महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक त्या नागरी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील. याशिवाय, कर वसुलीतून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल. याअनुषंगाने, जळगाव शहरालगतच्या कुसुंबा, रायपूर, असोदा, ममुराबाद, आव्हाणे, मोहाडी, मन्यारखेडा, बांभोरी आदी गावांपर्यंत हद्द वाढविण्याचा विचार महापालिकेकडून केला जाण्याची शक्यता आहे. हद्दवाढ करायची झाल्यास संबंधित ग्रामपंचायतींचे नाहरकत पत्रही महापालिका प्रशासनाला घ्यावे लागणार आहे.
अनेक वर्षांपासून हद्दवाढीची मागणी
शहराची हद्दवाढ होणे काळाची गरज आहे. परंतु सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे; आहे त्या हद्दीतच कामे करणे अशक्य होत आहे, त्यात नवीन हद्दवाढ केली आणि त्या ठिकाणांहून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर तेथील विकास कामांवरच उलट खर्च वाढणार आहे. त्यामुळे सध्यातरी हद्दवाढीचा विचार करणे योग्य होणार नाही. असा देखील एक मतप्रवाह सध्या पाहायला मिळत आहे.

सुवर्णनगरीच्या विकासाची गती वाढण्याची गरज
जळगाव शहराचा विकासाचा वेग वाढवणे ही काळाची गरज आहे. शहराचे लोकसंख्येचे प्रमाण वाढत असून त्यानुसार पायाभूत सुविधांची गरजही वाढली आहे. रस्त्यांची डागडुजी, वाहतुकीचे नियोजन, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या बाबतीत अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची आवश्यकता आहे. जळगावमध्ये औद्योगिक व आयटी पार्क उभारले गेले पाहिजेत, जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शहर व्यवस्थापन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करता येईल.
जळगावचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व जपून पर्यटनाची संधीही वाढवता येईल. शहरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि सार्वजनिक सेवा यामध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकार व स्थानिक प्रशासनाने संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. जळगाव शहराचे नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास झाले तर हे शहर उत्तर महाराष्ट्रातील एक आदर्श शहरी केंद्र म्हणून उभे राहू शकेल. त्यामुळे विकासाचा वेग निश्चितच वाढवावा लागेल.