Manikrao Kokate : मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, कोणताही शेतकरी पिक विम्यातून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, तसेच शासनाने केलेल्या पिक नुकसान अहवालावर आधारित पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. पीक विम्याबाबत जिल्हास्तरावरील प्रकरणे तत्काळ निकाली काढा, असे निर्देश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत.
पिक विम्याचे वेळेत वाटप करावे…
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपन्यांनी शासनाकडे केलेले अपील लवकरात लवकर निकाली काढून शेतकऱ्यांनी पिक विम्याचे वेळेत वाटप करावे. तसेच पिक विमा कंपन्यांनी जे दावे फेटाळले आहेत ते तपासून घ्यावेत. असे निर्देश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. सर्व पात्र पिक विमा धारकांना नियमानुसार लाभ मिळेल याची यंत्रणांनी कटाक्षाने खबरदारी घ्यावी, आणि यामध्ये कृषी विभाग व विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश कोकाटे यांनी दिले.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई नये…
सध्याचा पाऊस शेतीसाठी अनुकूल नाही, १० तारखेनंतर पावसाची स्थिती पाहूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलं आहे. तर सध्याच्या पावसामुळं पाण्याचा साठा झाला आहे, पण शेतीसाठी योग्य नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. मे महिन्यात यंदा सरासरीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पण सध्या पेरणी करण्याची घाई करु नका, असं आवाहन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. दरम्यान, पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी दूरदृश्यप्रणालीव्दारे परभणी, नांदेड व नाशिकचे जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.